भगवान विष्णूंची २४ नांवे : भाग २

सुधीर लिमये

पेण, निवृत्त अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

प्रिया जोशी

एप्रिल २०२३च्या मैत्राच्या अंकामध्ये भगवान विष्णूंची २४ नांवे : भाग १ प्रकाशित झाला होता व त्यात विष्णूच्या पहिल्या चार नावांसंबंधी माहिती दिली होती. ह्या भागामध्ये त्यापुढील चार नावांची माहिती दिलेली आहे

विष्णवे नम:

विष्णू हे आचमनातील पाचवे नाव. विष्णवे नमः ते हरये नमः ही नावे उच्चारताना हात जोडलेल्या स्थितीत असावेत. विष्णू षोडशनाम स्तोत्रात ‘औषधे चिन्तयेद्विष्णु’ म्हणजेच औषध घेत असताना भगवान विष्णूंचे स्मरण करावे असे सांगितले आहे.

जो सर्वांना अंतर्बाह्य व्यापून टाकतो, व जो सर्वांमध्ये व्याप्त आहे तो विष्णू. सर्व विश्वाला व्यापून असणारा विष्णू. ज्याच्या कांतीने पृथ्वी, आकाश, व सारे विश्व व्यापले आहे असा तो विष्णू. विश्+अणू = अणुमध्येही प्रवेश करू शकणारा, अतिसूक्ष्म रूप धारण करणारा तो विष्णू.

विष्णू सहस्रनामातील २, २५८, ६५७ वे नांव विष्णू आहे. भगवद्गीतेत विष्णू नावाचा उल्लेख विश्वरूप दर्शन योग (अकराव्या) अध्यायात २४ व्या व ३० व्या श्लोकांत दोनदा आहे. श्रीकृष्णाचे विराट विश्वरूप पाहून भयभीत झालेला अर्जुन म्हणतो, ‘हे विष्णो, हे विराट रूप पाहून मी भयभीत झालो आहे, त्यामुळे माझे मनोधैर्य आणि मनःशांती नष्ट झाली आहे ॥२४॥’, ‘हे विष्णो,आपल्या विशाल मुखाने आपण सर्व लोकांचा घास करून गिळत आहात व आपल्या जिभेने सर्व बाजूंनी चाटत आहात व हे सर्व विश्व आपल्या देदीप्यमान प्रकाशाने उजळून निघत आहे व तप्तही होत आहे. ॥३०॥’

विष्णूरूपात हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात - उजव्या समोरच्या हातात - कौमोदकी गदा, उजव्या पाठीमागच्या हातात - सुदर्शन चक्र, डाव्या पाठीमागच्या हातात - पांचजन्य शंख, डाव्या समोरच्या हातात - पद्म. विष्णूची शक्ती धृती, तर लक्ष्मीरूप पद्मिनी आहे.

रानी की बाव, पाटण, गुजरात येथे भगवान विष्णूची गदा, चक्र, शंख, पद्म आयुधे असलेली त्रिभंगा स्थितीतील विविध अलंकारांनी विभूषित सुंदर मूर्ती पहावयास मिळते. फोटो - श्री.चंद्रहास हालाई, माहिती - श्री.पुरूषोत्तम लेले यांचे फेसबुक पेज

मधुसुदनाय नमः

आचमनातील सहावे नाव ॐ मधुसुदनाय नमः असे आहे. विष्णू सहस्रनामातील ७३वे नाव मधुसुदन आहे. मधुसुदनाची शक्ती शांती आहे तर लक्ष्मीरूप कमलालया आहे. श्री विष्णू षोडशनाम स्तोत्रात म्हटले आहे की, ‘दु:स्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसुदनम्’, म्हणजेच, संकटात मधुसूदनाचे स्मरण करावे म्हणजे संकटाची तीव्रता कमी होते, संकट दूर होते. भगवद्गीतेत पहिल्या, सहाव्या व आठव्या अध्यायात अर्जुनाने तर दुसऱ्या अध्यायात संजयाने श्रीकृष्णाचा मधुसूदन असा उल्लेख केल्याचे पाहायला मिळते.

मधु नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून मधुसूदन. देवी भागवतातील कथेनुसार भगवान विष्णू योगनिद्रेत असताना त्यांच्या कानातील मळापासून मधू व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी कठोर तपश्चर्येने देवी भगवतीकडून त्यांची इच्छा असेल तेव्हाच मरण येईल असे वरदान मिळवले होते. विष्णूंनी मधु-कैटभाचा पराभव केला पण ते त्यांना ठार मारू शकले नाहीत. विष्णूंनी देवी भगवतीच्या सल्ल्यानुसार योजना आखली. विष्णूंनी मधु-कैटभांच्या पराक्रमाची स्तुती केली व त्यांना वर मागण्यास सांगितले. त्याचवेळी देवी भगवतीने मधु-कैटभांना मोहित केले. उन्मत्त झालेल्या त्या दोघांनी भगवान विष्णूंनाच उलट वर मागायला सांगितले. त्यावेळी विष्णूंनी मला तुमचा मृत्यु हवा आहे असे सांगितले. त्यामुळे मधू-कैटभांना मृत्यू आला.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे, लवणासुर दैत्याचा भगवान विष्णूंनी वध केला होता तेथे भगवान विष्णूंना दैत्यसुदन म्हटले जाते. मधुसूदन रूपात विष्णूंची हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात- उजव्या समोरच्या हातात - सुदर्शन चक्र, उजव्या पाठीमागच्या हातात - पांचजन्य शंख, डाव्या पाठीमागच्या हातात - पद्म, डाव्या समोरच्या हातात - कौमोदकी गदा.

लक्ष्मी नृसिंह मंदिर, नुग्गेहळळी, ता. चन्नरायपट्टम, जि. हसन, कर्नाटक येथील होयसळा शैलीतील उजवीकडून चक्र, शंख, कमळ, गदा आयुधे असलेली मधुसुदनाची स्थानक मूर्ती. फोटो - टी. एस. गोपाळ, माहिती - श्री. पुरूषोत्तम लेले यांचे फेसबुक पेज

त्रिविक्रमाय नमः

आचमनातील सातवे नाव त्रिविक्रमाय नमः असे आहे. विष्णू सहस्रनामातील ५३० वे नाव त्रिविक्रम आहे. तिन्ही लोकांना जिंकणारा, त्रिविक्रम रूपात ज्याने तीन पावले टाकत स्वर्ग, पृथ्वी व पाताळ हे तिन्ही लोक व्यापले तो.

श्रीविष्णू षोडशनाम स्तोत्रात म्हटले आहे, ‘युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमम्’, अर्थात, युद्धामध्ये चक्रधारी श्रीकृष्णाचे स्मरण करावे तर प्रवासात त्रिविक्रमाचे स्मरण करावे म्हणजे प्रवास सुखाचा होतो.

भगवद्गीतेत अर्जुनाने अथवा संजयाने श्रीकृष्णाचा त्रिविक्रम नावाने उल्लेख केलेला नाही. बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू. हिरण्यकश्यपुचा पणतू, असुर कुळातला. त्याने इंद्राचे राज्य मिळवण्याच्या हेतूने शंभर यज्ञ केले. म्हणून इंद्राने विष्णूकडे सहाय्य मागितले. विष्णूने कश्यप व अदिती यांच्या पोटी वामनरूपात जन्म घेतला. इंद्र त्याचा मोठा भाऊ. वासव म्हणजे इंद्र. म्हणून विष्णूचे वासवानुज (३२२)असेही नाव आहे.‌ त्रिविक्रम हे वामन अवतारात भगवान विष्णूचे विराट रूप म्हणायला हरकत नाही. आधी वामन रूप, व नंतर बळीने दानाचा संकल्प सोडल्यानंतर त्रिविक्रम रूप धारण केले.

त्रिविक्रम रूपात विष्णूच्या हातातील आयुधे अश्या पध्दतीने असतात- उजव्या समोरच्या हातात - पद्म, उजव्या पाठीमागच्या हातात - कौमोदकी गदा, डाव्या पाठीमागच्या हातात - सुदर्शन चक्र, डाव्या समोरच्या हातात - पांचजन्य शंख.

लक्ष्मी नारायण मंदिर, जवागल, कर्नाटक येथील मंदिराच्या बाह्य भिंतीवर प्रदक्षिणा मार्गावर भगवान विष्णूची पद्म, गदा, चक्र, शंख आयुधे असलेली त्रिविक्रम रूपातील मूर्ती. फोटो - श्री. पांडुरंग शर्मा, माहिती - श्री.पुरूषोत्तम लेले यांचे फेसबुक पेज.

वामनाय नमः

आचमनातील आठवे नाव ॐ वामनाय नमः असे आहे. विष्णू सहस्रनामातील १५२ वे नाव वामन आहे. वामन याचा अर्थ उंचीने कमी असलेला किंवा बुटका. दुसरा अर्थ मौंजीबंधनाच्यावेळी झालेला बटू. जो बळीच्या यज्ञात वामन रूपाने आला होता. उत्तम प्रकारे भक्ती करण्यास योग्य असणारा.

श्रीविष्णू षोडशनाम स्तोत्रात असे म्हटले आहे की, ‘गमने वामनं चैव, सर्व कार्येषु माधवम्’, अर्थात, प्रवासाला आरंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णाचे स्मरण करावे‌ म्हणजे ज्या कार्याला आपण निघालो आहोत ते काम सफल होते. भगवद्गीतेत अर्जुनाने अथवा संजयाने श्रीकृष्णाचा वामन म्हणून उल्लेख केलेला नाही. वामनरूपी विष्णूची शक्ती दया आहे तर लक्ष्मी रूप वृषाकपि आहे. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत पिऊन देवगण बलशाली झाले. देवांनी अमृत दिले नाही म्हणून दैत्यांना मोठे दुःख झाले, क्रोध आला. त्यांनी देवांबरोबर युद्ध चालूच ठेवले. शेवटी इंद्राने वज्र हाती घेतले व दैत्यांकडील बळीला वज्राने मारले. नारदमुनींनी देवांना दैत्यसंहारापासून परावृत्त केले. युद्ध थांबले. नारदमुनींच्या म्हणण्यानुसार राजा बळीचा देह घेऊन असुर गुरू शुक्राचार्यांच्याकडे गेले. त्यांनी संजीवनी मंत्रसामर्थ्याने बळीला पुनर्जीवित केले. दैत्यराजा बळी समर्थ होता व गुरूभक्तही होता, म्हणून तो सामर्थ्यशाली झाला होता. त्याच्या सेनेने इंद्राच्या अमरावतीला घेरले. बळीने स्वर्गात सर्व लोकांवर विजय मिळवला. त्यामुळे बृहस्पती गुरूंच्या आदेशानुसार, स्वर्गातील सर्व देवांना स्वेच्छेनुसार रूप धारण करून स्वर्गाचा त्याग करून लपून राहावे लागले.

होयसळेश्वर मंदिर, हळेबिडू, कर्नाटक, येथील मंदिराच्या मंडोवरावर वामन बटू, बळी राजा व त्याची पत्नी विंध्यावली यांचे सुंदर शिल्प. राजा बळी हातातील झारीने वामनरूपी बटूच्या हातात संकल्प करून पाणी सोडत आहे. माहिती - श्री.पुरूषोत्तम लेले यांचे फेसबुक पेज

कश्यप ऋषींच्या दोन भार्या होत्या - दिती आणि अदिती. दितीचे पुत्र दैत्य, सर्व राक्षस. तर आदितीचे पुत्र आदित्य, सर्व देवतागण. आपल्या पुत्रांमध्ये काही सामर्थ्य राहिले नाही, त्यांचे वैभव राहिले नाही, तेव्हा आदितीने त्यांना वैभव प्राप्त व्हावे म्हणून, कश्यप ॠषींच्या सांगण्यावरून ‘पयोव्रत’ केले. भगवंत प्रसन्न झाले, पण दैत्य धर्मपूर्वक राहात असल्याने देवगण दुर्बळ झाले असले तरी काही करू शकले नाहीत. मात्र इंद्राला इंद्रपद मिळवून देण्यासाठी, इंद्राचा लहान भाऊ होण्यासाठी अदितीच्या पोटी भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवंतांनी जन्म घेतला. वामनरूप धारण केले. वामन रूपातील भगवंतांचा यज्ञोपवित संस्कार झाला. सूर्यदेवांनी गायत्री मंत्राचा उपदेश केला. वृक्षाधिपती चंद्राने दंड दिला, मातेने कौपीन दिले, आकाश देवतेने छत्री दिली. ब्रह्मदेवांनी कमंडलू दिला. सप्तर्षींनी कुश, सरस्वतीमातेने अक्षमाला दिली, यक्षराजाने भिक्षापात्र दिले.

नर्मदा किनाऱ्यावर भृगुकच्छ राजा बळी यज्ञ करीत होता तिथे बटु वेषातील भगवान एका हातात छत्री, दुसऱ्या हातात कमंडलु, कुश घेऊन पोहोचले. बटूच्या दर्शनाने राजा बळी मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिला. भानावर येऊन त्याने बटूचे अर्घ्य-पाद्यासहित सर्व उपचारांनी स्वागत केले व ‘आपली काय इच्छा असेल ते मागावे, मी देण्यासाठी तयार आहे’ असे सांगितले. भगवान म्हणाले, “तू जे वचन उच्चारलेस ते तुझ्या कुळपरंपरेला साजेसेच आहे. तू प्रल्हादाचा वंशज आहेस. राजा, तू सगळे काही देऊ शकतोस हे जरी खरे असले तरी मला फार काही नको. मला अधिक वस्तूंची लालसा नाही. तीन पावले जमिनीपेक्षा अधिक मला काही नको. तेवढ्याने मी संतुष्ट आहे.” हे ऐकून राजा बळीला हसू आले. तो म्हणाला, “इतकेच ना? मी तयार आहे.” असे म्हणत संकल्प सोडण्यासाठी त्याने हातात झारी घेतली. दान करण्याच्या तयारीत असलेल्या राजा बळीला पाहून गुरू शुक्राचार्यांना वाटले की राजा बळी घोटाळ्यात येणार आहे. हा वामन दिसतो छोटा पण आहे मोठा खोटा. त्यांनी बळीला त्याची कल्पना दिली, “हे बळी, हा बटू म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत. एका पावलातच पृथ्वी व्यापतील. आपल्याला राहायला घरही राहणार नाही. तरी हे करू नकोस.”

बळीने शुक्राचार्यांना सांगितले, “साक्षात विष्णू आले असतील तर चांगलेच आहे. मी दान देणारच.” सुवर्णकुंभ घेऊन बळीची पत्नी विंध्यावलीही तेथे आली. त्यांनी वामन भगवानांचे छोटे छोटे चरण प्रक्षालन करून पूजा केली व दानाचा संकल्प करण्यासाठी हातात जल घेऊ लागले. तेव्हा शुक्राचार्य सूक्ष्म रुप धारण करून सुवर्णकुंभाच्या तोटीत जाऊन बसले व पाण्याचा मार्ग रोखून धरला. (तेव्हापासून एखाद्या योजनेत खोडा घालण्यासाठी काहीतरी कारण काढून विरोध करणाऱ्या लोकांना झारीतील शुक्राचार्य म्हणू लागले.)

तेव्हा वामनरूपी भगवानांनी, हातातील कुशाने तो मार्ग मोकळा केला. हातावरून उदक सोडत राजाने आणि राणीने संकल्प सोडला.‌ बळीने दानाचा संकल्प सोडल्यानंतर विष्णूने त्रिविक्रम रूप धारण केले. वामनरूपी भगवानांनी एका‌ पावलाने स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली व बळीला तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले असता बळीने आपले मस्तक पुढे केले. भगवानांनी त्याचे मस्तकावर पाऊल ठेवले व त्यास पाताळात लोटले. बळी चिरंजीव झाले. सप्तचिरंजीवांमध्ये त्याचेही नाव घेतले जाते -

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषणः
कृपः परशुरामश्च सप्तैतः चिरंजीविन: ।।

सुभाषितकारांनी बळीच्या अति‌दानासंबंधी, दुर्योधनाच्या अतिमानी स्वभावा व अभिमानासंबंधी, रावणाच्या अतिगर्व, अहंकारासंबंधी नाराजी व्यक्त करत अतिरेक सर्वत्र टाळावा असे सुचविले आहे.

अति दानात् बलिर्बद्धः अभिमानात् सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्यात् अतिः सर्वत्र वर्जयेत् ||

वामन रूपात विष्णूच्या हातातील आयुधे अश्या पद्धतीने असतात- उजव्या समोरच्या हातात - पांचजन्य शंख, उजव्या पाठीमागच्या हातात - सुदर्शन चक्र, डाव्या पाठीमागच्या हातात - कौमोदकी गदा, डाव्या समोरच्या हातात - पद्म. विष्णूंच्या चोवीस नावांमध्ये वामन व नृसिंह ही दोन‌ नावे विष्णू दशावतारातील आहेत.

Comments

Popular posts from this blog