||श्रीमद्भागवत पुराण||

सौ. सोनाली पानसरे-जोग

श्रीमद्भागवत स्कंद १ (श्री श्रीमदभयचरणाविंद भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद लिखित श्रीमद्भागवतातून घेतलेला काही मोजका भाग).

भागवत पुराणातील पहिला स्कंद अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यात पहिल्या तीन श्लोकांत ईश्वराची ओळख आणि श्रीमद्भागवतपुराण या ग्रंथाचा महिमा सांगितला आहे.पहिला श्लोक म्हणतो, ईश्वर किंवा भगवंत ज्यांना म्हणतात ते परब्रह्म वसुदेवपुत्र श्रीकृष्ण आहेत. ते भक्तांच्या व सर्व साधकांच्या ध्यानाचा एकमेव विषय असून सर्वव्यापी, परमसत्य आहेत. ह्या विश्वाच्या निर्मिती, पालन-पोषण आणि विनाश या तिहींचे तेच कारण आहेत. त्यांनीच प्रथम ब्रह्माजींच्या हृदयात वेदज्ञान दिले. अश्या वासुदेव श्रीकृष्णाला वंदन करून भागवत सुरु होते.

भागवत पुराणाचा महिमा सांगताना व्यासऋषी म्हणतात की भौतिकदृष्ट्या प्रेरित असलेल्या कोणत्याही धार्मिक कार्यांना भागवतात जागा नाही. सर्वोच्च सत्य सांगणारे हे पुराण फक्त अंतःकरणाने पूर्णपणे शुद्ध असलेल्या भक्तांनाच समजू शकते. वास्तवात हे सर्वोच्च सत्य आहे, जे श्रवण केल्यावर त्रिविध दु:खांना उखडून टाकते. असे हे सुंदर भागवत महान ऋषी व्यासदेव यांनी त्याच्या परिपक्वतेमध्ये संकलित केले आहे आणि ते ईश्वरप्राप्तीसाठी पुरेसे आहे. भागवताचा संदेश लक्षपूर्वक आणि नम्रपणे ऐकताच या ज्ञानाद्वारे परम भगवान साधकाच्या हृदयात स्थापित होतात. त्यामुळे सर्व साधकांनी, तसेच तज्ज्ञ आणि विचारी पुरुषांनी, वैदिक साहित्याच्या कल्पवृक्षाचे परिपक्व फळ असलेले श्रीमद्भागवत, जे श्री शुकदेव गोस्वामींच्या ओठातून बाहेर पडल्यामुळे अधिकच श्रवणीय बनले आहे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे.

भगवंत आणि भागवत पुराणाचे वर्णन केल्यावर भागवत कुठे आणि कोणी कोणास सांगितले ह्याचा इतिहास सुरू होतो. गोष्टरूपात हा इतिहास साधकांना एकमेकांचा आदर करताना पाळले जाणारे शिष्टाचार शिकवतो. पण मुख्य विषय म्हणजे भगवंताचे खरे स्वरूप, जे वेदांनी वर्णन करताना कठीण करून ठेवले आहे, ते ह्यात सहज करून सांगितले आहे आणि त्याला प्राप्त करण्याच्या भक्तीमार्गाचे ह्यात वर्णन केले आहे. भक्तांच्या अनेक गोष्टी आणि त्यांच्या आनंदासाठी तसेच रक्षणासाठी भगवंतांनी घेतलेल्या विविध अवतारांच्या गोष्टी व त्यांच्या प्रत्येक कृतीमागील तत्त्वज्ञान भागवतात सांगितले आहे. ज्ञानमार्गावरील क्लिष्ट विषयांची उकल आणि ध्यानाचा केंद्रबिंदू असणाऱ्या श्रीकृष्णाची ही कथा सर्वदृष्टीने मंगलमयी आहे.

एकदा नैमिष्यारण्यातील एका पवित्र ठिकाणी शौनक ऋषींच्या नेतृत्वाखाली अनेक महान ऋषी एकत्रित आले. भगवान आणि त्याच्या भक्तांच्या समाधानासाठी त्यांनी एक हजार वर्षांचा महान यज्ञ करण्यास प्रारंभ केला. नैमिष्यारण्य हे विष्णूचे आवडते स्थान असून इथे दुष्ट प्रवृत्तींचा प्रभाव पडत नाही व यज्ञादि कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. तसेच ब्रह्मदेवाने संपूर्ण जगाचा समावेश होईल असे चक्र तयार केले होते, तेव्हा त्याचा केंद्रबिंदू हे अरण्य होते. त्यामुळे इथे केलेल्या अध्यात्मिक प्रयत्नांची ऊर्जा सर्व जगाला मिळते. म्हणून, यज्ञासाठी हे स्थान ऋषींनी निवडले होते. एके दिवशी त्यांनी यज्ञात अग्नी प्रज्वलित केला आणि श्रीसुत गोस्वामींना मानाचे आसन अर्पण करून पुढील बाबींची अत्यंत आदराने चौकशी केली. महान ऋषी म्हणाले, “हे आदरणीय सुत गोस्वामी, तुम्ही सर्व दुर्गुणांपासून पूर्णपणे मुक्त आहात. धार्मिक जीवनासाठी प्रसिद्ध असलेल्या सर्व धर्मग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये आणि इतिहासातही तुम्ही पारंगत आहात. तुमच्या आध्यात्मिक गुरुंनी तुमच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन तुम्हाला सर्व ज्ञान प्रदान केले आहे. त्यामुळे संपूर्ण मानव आणि समाजकल्याणाकरता जे सर्वोत्तम ज्ञान असल्याचे शास्त्रांनी निश्चित केले आहे ते ज्ञान कृपया आम्हांला समजण्यास सोप्या भाषेत समजावून सांगा.”

“तसेच, शास्त्राचे अनेक प्रकार आहेत, ते वेगवेगळ्या जीवांच्या हिताचे मार्ग सांगतात; पण असे सर्व शास्त्रांचे सार जे संपूर्ण प्राणिमात्रांच्या हितासाठी आहे व ऐकणाऱ्यास समाधान देते ते सार आम्हाला समजावून सांगा.”

“तसेच, हे सुत गोस्वामी, स्वतः भगवंत देवकीच्या उदरात वसुदेवाचा पुत्र म्हणून कोणत्या उद्देशाने प्रकट झाले? भक्तांचे रक्षण करण्यासाठी इतर अवतार किंवा देवदेवताही येऊ शकल्या असत्या, आणि संहार करण्यासाठी भगवंत प्रगट होऊन संहारकार्य करून परत अप्रगट होऊ शकेल असते. पण प्रत्यक्ष भगवंतांना, जे सर्व अवतारांचे मूळ आहेत, त्यांना ही जन्मलीला कोणत्या उद्देशपूर्तीकरता करावी वाटली?”

“अगदी नकळत कृष्णाच्या पवित्र नामाचा जप करून, जन्म-मृत्यूच्या जाळ्यांत अडकलेल्या जीवांना ताबडतोब मुक्ती मिळू शकते, त्या श्रीकृष्ण व बलरामांनी मनुष्याप्रमाणे कोणत्या अलौकिक लीला केल्या? मनुष्याप्रमाणे असे विचारण्याचा उद्देश हा की यशोदेने बांधलेली दोरी ते सहज तोडून टाकू शकत होते, तसेच कालियाच्या विळख्यात जाण्यापूर्वीच त्याला सुदर्शनचक्राने परास्त करू शकले असते. पण त्यांनी मानवसदृश्य लीला केल्या. त्या लीलांचे वर्णन ऐकण्यास आम्ही मुनी आतूर आहोत.”

“त्यांनी भक्तांना प्रसन्न करण्यासाठी अनेक अवतार घेतले. त्यांच्या त्या अवतारांबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही आतूर आहोत. तेव्हा त्यांचे विविध अवतार आणि अवतारकार्य आम्हाला सांगा. त्यांची दिव्यकृत्ये भव्य आणि कृपाळू आहेत आणि नारदासारखे महान विद्वान ऋषी त्यांचे गायन करतात. म्हणून त्याच्या विविध अवतारांमध्ये ते करत असलेल्या साहसांबद्दल ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

“आम्हाला त्रस्त करणारा आणखी एक प्रश्न आहे. परमसत्य व सर्व गूढ शक्तींचे स्वामी भगवान श्रीकृष्ण हे ह्या भूमीवर धर्माचे रक्षण करत होते, पण ते आता त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी निघून गेले आहेत. कृपया आम्हाला सांगा की धार्मिक तत्त्वे आता कोणाच्या आश्रयास जाणार? त्यांचा सांभाळ आता कोण करणार? थोडक्यात, आपल्या जड व स्थूल शरीराचा उपयोग फक्त कृष्णसेवेकरता करून आपण कृष्णमय होणे हाच धर्म आहे. कृष्ण पृथ्वीवर असताना भक्तांना ते सहज शक्य होते, पण ते गो-लोकांत गेल्यावर आता पृथ्वीवरील जीव कृष्णमय कसे होतील?”

भगवान श्रीकृष्ण आणि मानवतेच्या कल्याणाविषयीच्या ऋषीमुनींच्या प्रश्नांनी प्रसन्न झालेल्या, रोमहर्षणपुत्र सुत गोस्वामींनी ह्या प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात केली आणि तेच हे श्रीमद्भागवत. हे भागवत सुत गोस्वामींनी त्यांचे गुरू श्री शुकदेव गोस्वामी यांच्याकडून पूर्वी प्रत्यक्ष ऐकले होते. त्यावेळी श्री शुकदेव गोस्वामींनी हे ज्ञान श्री परिक्षित महाराजांना सांगितले होते. श्रीशुकदेव गोस्वामी यांनी हे ज्ञान त्यांचे वडील व्यासदेव यांच्याकडून, व्यासांनी नारदमुनींकडून, नारदमुनींनी ब्रह्मदेवाकडून आणि ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष श्री विष्णुंकडून हे परंपरेने ग्रहण केले होते. तसेच व्यासांनी रचलेले वेदान्तसूत्र/ब्रह्मसूत्र सर्व वेदांचे सार आहे आणि त्या वेदांतसूत्रावरील त्यांचेच भाष्य म्हणजे श्रीमद्भागवतपुराण. हे गोपनीय आहे, कारण कथेच्या, तसेच प्रश्नोत्तराच्या रूपाने सांगितलेले हे पुराण ऐकण्यास सरळ वाटत असले तरीही त्यात तत्त्वज्ञान आहे आणि त्याच्या फक्त श्रवण व कीर्ततनाने मनुष्य भवसागर तरुन जातो. हे पुराण श्रीकृष्णाशी संबंधित असल्यामुळे हे सांगणारे सुत गोस्वामी कीर्तनभक्ती करून, तर ऐकणारे परीक्षित महाराज श्रवणभक्ती करून सर्व बंधनातून मुक्त झाले. सुत गोस्वामीमुनी परमेश्वराच्या अखंड, निःस्वार्थ भक्तीसेवेमध्ये खरा धर्म आहे यावर पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना भर देतात. त्यांनी स्पष्ट केले, की मनुष्याने आपली प्रत्येक कृती आणि त्यांचे परिणाम भगवंताला अर्पण केले पाहिजेत, असे शास्त्र सांगते, कारण अश्या भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या प्रत्येक कृतीमुळेच आत्मा आणि परमेश्वर ह्या दोघांनाही समाधान मिळते. भक्तीद्वारे परमसत्य, म्हणजेच - ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान - ह्यांचा शोध घेणे हा मानवी जीवनाचा उद्देश आहे. पुढे ते कर्म व कर्मफळाबद्दल स्पष्टीकरण करताना सांगतात की भगवंताच्या संदेशाकडे आकर्षित न करणारे कोणतेही कार्य व्यर्थ मानले जाते. तसेच, त्या कार्यातून मिळालेल्या भौतिक लाभाचा (फळाचा) उपयोग इंद्रियतृप्तीसाठी नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठी केला पाहिजे. विहित कर्तव्यांचे पालन करून आणि भगवंताच्या कृपेचे स्मरण ठेवून वर्णाश्रमाच्या आदेशानुसार स्वतःची निर्धारित कर्तव्ये पार पाडून सर्वोच्च सिद्धी प्राप्त होऊ शकते. म्हणून एकाग्र चित्ताने भगवंताचे सतत श्रवण, स्मरण आणि उपासना करत आपली विहितकर्मे पूर्ण निष्ठेने करावी.

केवळ भक्तिपूर्ण कर्म करून आत्मशुद्धी कशी होते आणि त्या मार्गावरील प्रगतीची लक्षणे कोणती, तेही सुत गोस्वामी सांगतात. सर्वप्रथम दुर्गुणांपासून पूर्णपणे मुक्त असलेल्या भक्तांची सेवा केल्यास भगवंताचा उपदेश ऐकण्याप्रति आत्मीयता प्राप्त होते. संदेश ऐकण्याची इच्छा निर्माण झालेल्या साधकांच्या हृदयातून भौतिक उपभोगाची इच्छा भगवंत काढून टाकतात आणि साधक जेव्हा त्या संदेशाचे योग्यरित्या श्रवण करतो तेव्हा त्याच्यातील रज आणि तम कमी झाल्याने, सत्त्वगुणातील सद्गुण हळूहळू दिसू लागतात. असा साधक भागवत कथा नियमित ऐकतो आणि शुद्ध भक्ताची सेवा करतो. त्यामुळे अंतःकरणाला त्रासदायक असलेल्या सर्व गोष्टी जवळजवळ पूर्णपणे नष्ट होतात. अश्याप्रकारे हृदयात भगवंताप्रति अपरिवर्तनीय प्रेमळ सेवा प्रस्थापित होताच रज आणि तमोगुणामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व वासना, इच्छा आणि लालसा हृदयातून नाहीश्या होतात. मग भक्त सत्कृत्यात म्हणजे फक्त शुद्ध सत्त्वगुणी कृत्य करण्यात स्वतःला व्यग्र करतो आणि तो पूर्ण आनंदी होतो. अशा प्रकारे धार्मिक मार्गावर स्थापित झालेला मनुष्य सर्व भौतिक संगतीपासून मुक्त होतो व भगवंताच्या स्वरूपाचे त्याला ज्ञान होते. भगवज्ज्ञानामुळे, त्याला स्वरूपज्ञान होते आणि कर्मबंधनाची साखळी संपुष्टात येते. म्हणून, अनादि काळापासून सर्व श्रेष्ठ मुनी व भक्त श्रीकृष्णाची अत्यंत आनंदाने भक्तीसेवा करत आहेत. कारण, अशी भक्तीसेवा त्यांना आत्मदर्शन देते.

वासुदेवपरा वेदा वासुदेवपरा मखा: ।
वासुदेवपरा योगा वासुदेवपरा: क्रिया: ॥
वासुदेवपरं ज्ञानं वासुदेवपरं तप: ।
वासुदेवपरो धर्मो वासुदेवपरा गति: ॥

शास्त्रातील ज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट श्रीकृष्ण आहेत. यज्ञ त्यांना प्रसन्न करण्याकरता आहेत. योगसाधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत. सर्व कर्मांची फळे हा त्यांच्याकडून मिळालेला पुरस्कार आहे. श्रीकृष्णच परमज्ञान आहेत आणि त्यांना जाणून घेण्यासाठीच योगी कठोर तपस्या करतात. त्यांची प्रेमसेवा करण्यातच धर्म आहे आणि तेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे.

पुढे सुत गोस्वामी भगवंताचे विविध अवतार सांगण्यास सुरुवात करतात ते आपण पुढील भागात बघू.
(क्रमशः)

Comments

  1. खूप छान ! अप्रतिम लेखन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मध्यमा

चंद्रस्पर्श