जननी

वरदा वैद्य

जनुकचिकित्सा म्हणजेच Gene Therapy! एखाद्याच्या जनुकांमध्ये असलेला दोष जनुक-चिकित्सेने दुरुस्त करता येतो.

जनुके म्हणजे कोणत्याही सजीवातील कळीचा घटक. जनुकांमध्ये असलेल्या फरकांमुळे एक सजीव दुसऱ्यापेक्षा वेगळा दिसतो. त्यामुळेच उंच-बुटके, जाड-बारीक, सुंदर-कुरूप, वगैरे फरक आपल्याला करता येतात. जनुकचिकित्सा अलीकडेच लोकप्रिय झाली आहे. पूर्वी आनुवांशिक रोगनिवारणासाठी जनुकचिकित्सा वापरली जात असे. एखादे सदोष जनुक दुरुस्त करणे शक्य नसल्यास बदलून त्याजागी हवे तसे निरोगी/सुदृढ जनुक घातले जात असे. ह्या चिकित्सेने अनेकांचे प्राण वाचवले.

पण एवढ्यावरच ही चिकित्सा मर्यादित राहती तर आपल्यावर ही गोष्ट सांगण्याची वेळच आली नसती.

जनुकचिकित्सेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सदोषच नव्हे तर कोणत्याही जनुकांवर काम करता येते - अगदी निरोगी, सुदृढ जनुकांवरही. आता म्हणाल की चांगल्या/निरोगी जनुकांत दुरुस्त करण्यासारखे काय असणार? ह्या जनुकांमध्ये ‘दोष’ नसला तरी उणीवा असू शकतात. आपल्याकडे नसलेली गोष्ट हवीशी वाटणे हा एकप्रकारे दोषच झाला की! देखण्या लोकांकडे पाहिले की सर्वसामान्य लोकांना त्यांच्या सामान्य दिसण्यातली उणीव जाणवतेच. असे अनेक गुणांबद्दल म्हणता येईल. आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्यांकडे आहे म्हटल्यावर मत्सर वाटणे हे अगदी साहजिक आहे. ज्यांच्याकडे ते आहे त्यांनाही स्वतःतल्या इतर उणीवा दिसत असतात. देखणेपण लाभलेल्या एखाद्याला श्रीमंती नसल्याचे दुःख वाटेल, तर एखाद्या श्रीमंताला चुणचुणीतपणाच्या अभावाचा विषाद वाटेल. सौंदर्य, सुबत्ता, पद … प्रत्येकाला सर्व काही हवे असते. सर्वांना शिरजोर होण्याची आशा असते. शिवाय ही शिरजोरी पुढील पिढ्यांपिढ्यांत उतरत राहावी अशीही इच्छा असते. आजवर पैसा फेकून बुद्धिमान होता येत नव्हते, पण जनुकचिकित्सेने त्याचीही शक्यता निर्माण केली.

आपण कसे दिसणार हे जनुकेच ठरवतात. मग त्या जनुकांमध्ये फेरफार केले की आपला देखणेपणा आपणच ठरवू शकू. मुले देखणी हवीत? बलवान हवीत? करू की, काही हरकत नाही. कोणत्या जनुकांमध्ये बदल केला की हुशार, बुद्धिवान मुले पैदा करता येतील हेही संशोधकांनी शोधून काढले. त्यांनी छोट्या प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांतून हे सिद्ध झाले की बुद्धिमत्ताही बेतून घेता येते.

इथूनच मोठ्या जीवघेण्या स्पर्धेला सुरुवात झाली. आता सगळ्यांनाच बुद्धिमान मुले हवीशी झाली आणि अर्थात हे साहजिकही होते. आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेची वाहवा इतरांसमोर करता यावी असे सर्वांना वाटू लागले. जे त्यांच्या मुलांची बुद्धिमत्ता वाढवून घेण्यास समर्थ नव्हते त्यांना तुच्छ लेखले जाऊ लागले. कारण इतर अनेक गोष्टींप्रमाणे जनुकचिकीत्साही केवळ श्रीमंतांनाच परवडणार होती.

आता ह्या चिकित्सेचे परिणाम तपासण्याची ही पहिलीच वेळ होती. लाभार्थी म्हणून केवळ पाच जोडप्यांची निवड झाली. जनुकचिकित्सा परवडेल आणि शिवाय निरोगी, सुदृढ असतील अशा जोडप्यांना निवडले गेले. त्यांच्या होऊ घातलेल्या मुलांवर गर्भाशयात जाण्याच्या आधीपासूनच जनुकचिकित्सेचे प्रयोग होणार होते. ही पाच बाळे व्यवस्थित निपजली आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीत आयुष्य जगू लागली की इतर जोडप्यांना ही चिकित्सा उपलब्ध करून देता आली असती.

निसर्ग हा नेहमी सर्वाधिक हुशार असतो. निसर्गाकडे उत्क्रांतीचा अब्जावधी वर्षांचा अनुभव आहे. अनुवांशिकी (genetics) इतकी सोपी आणि सहज असती आणि मेंदू आणि बुद्धिमत्ता अशी सहज वाढवता आली असती तर निसर्गाने हे काम आधीच केले नसते का? पण हा तर्क फाट्यावर मारून संशोधकांनी जनुकांच्या फेरफाराचा मार्ग अवलंबायचा ठरवलाच.

प्रयोगाला सुरुवात झाली आणि मुले गर्भाशयात असल्यापासूनच समस्यांना सुरुवात झाली. त्या पाच जोडप्यांनी निर्माण केलेल्या पाच फलित गर्भांतील जनुकांमध्ये प्रयोगशाळेत फेरफार केले गेले ज्याने जन्माला येणारी मुले बुद्धिमान, देखणी आणि अटकर बांध्याची निपजावीत. मग हे गर्भ आयांच्या गर्भाशयांत सोडण्यात आले. केवळ अतिश्रीमंतांनाच परवडू शकतील अशा सुविधा ह्या जोडप्यांना पुरवण्यात आल्या. मात्र निसर्गाला कोणाच्या श्रीमंतीत वा परवडण्या/न-परवडण्यात रस नसतो. निसर्ग केवळ निसर्गनियमांना मानतो. हे नियम तोडू पाहाल तर निसर्ग भयंकर शिक्षाही देतो.

पहिल्या जोडप्याचा गर्भ सुरुवातीचा काही काळ नीट वाढत होता. मात्र गर्भाचे डोके नीट आकार घेऊ शकले नाही. त्याची वाढ खुंटली आणि तो गर्भावस्थेतच मृत झाला. दुसऱ्या जोडप्याच्या गर्भाचीही तीच गत झाली. तिसऱ्या जोडप्याचा गर्भ व्यवस्थित वाढला आणि बाळ जन्माला आले. मात्र ते बाळ काही क्षणांचेच सोबती ठरले. केवळ चौथ्या आणि पाचव्या जोडप्याचे बाळंतपण सुखरूप पार पडले आणि मुले जगली. पहिल्या तीन जोडप्यांना फारच वाईट मनोवस्थेतून आणि परिस्थितीतून जावे लागले. प्रयोगांमध्ये अडचणी येऊ शकतात ह्याची जाणीव संशोधकांना असतेच, तरी एवढ्या मोठ्या अपयशाची त्यांना अपेक्षा नव्हती. किमान शेवटची दोन बाळे जगली हेच ह्या परिस्थितीत खूप होते.

ह्या घटनांमुळे आणखी जोडपी निवडण्याचे काम स्थगित करावे लागले. तगलेल्या दोन मुलींची काळजी घेणे आणि त्यांच्या आयुष्यांचे निरीक्षण आणि नोंदी करण्याचे काम मात्र पुढे सुरू राहिले. इतर कोणी ह्या उपचारांसाठी पुढे येईना म्हटल्यावर पैशांचा ओघ थांबला. त्या दोन मुलींच्या आयुष्याचे निरीक्षण करण्यामध्ये उर्वरित गंगाजळी आटू लागली. संशोधन, नवे प्रयोग पुन्हा सुरू करण्यासाठी आता बरेच थांबावे लागते की काय अशी भीती संशोधकांना वाटू लागली. ह्या दोन मुलींचे आयुष्य यशस्वी होण्यावरच आता त्यांची मदार होती.

ह्या दोन्ही मुली लहानपणापासूनच निरोगी आणि उत्साही होत्या. त्यांना हवे-नको ते अगदी काटेकोर पुरवले जात होते. ह्या दोघी जसजशा मोठ्या होत गेल्या तसतसे त्यांच्यातले वेगळेपण ठळकपणे दिसू लागले. तसे एक मूल कधीच दुसऱ्या मुलासारखे नसते, पण ह्या मुलींमधले वेगळेपण वैशिष्ट्यपूर्ण होते. पहिल्यांदा हे वेगळेपण संशोधकांच्या लक्षात आले तसे ह्या मुलींना प्रयोगशाळेत पाचारण करण्यात आले. मुली तोवर चालू-धावू लागण्याच्या वयातल्या होत्या.

प्रयोगशाळेत ह्या मुलींच्या हातात काही वस्तू देण्यात आल्या. मुली ह्या वस्तू कशाप्रकारे हाताळतात ह्याचे निरीक्षण सुरू होते. पुढील काळात करण्यासाठी विविध चाचण्यांची तयारी संशोधकांनी केली होती. चौथ्या जोडप्याच्या मुलीला दिलेल्या वस्तूंमध्ये विशेष रस नव्हता. इतरांकडे बघत आणि गोड हसत ती दिलेल्या वस्तूंशी खेळत बसे. पाचव्या जोडप्याच्या मुलीने मात्र चटकन त्या वस्तू रचल्या आणि तिचे लक्ष आजूबाजूच्या वस्तूंवर भिरभरू लागले. इतक्या छोट्या मुलीला दिलेल्या वस्तू इतक्या पटकन रचता येणे अपेक्षित नव्हते, पण तिला ते सहज आणि लगेच जमले होते. मग ह्या मुलींना त्यांनी आणखी काही गोष्टी करायला दिल्या आणि संशोधकांच्या लक्षात आले की हे पाचवे बाळ खूपच बुद्धिमान आहे. काही काळाने मात्र तिचा पुढची गोष्ट करून दाखवण्यातल्या रस संपला. सगळ्यांना वाटले की छोटी आहे, कंटाळली असेल, दमली असेल, किंवा ही कठीण गोष्ट कशी पूर्ण करावी हे तिला समजले नसेल. मात्र त्या मुलीने आणखी ‘खेळण्याचा’ हट्टच धरला. संशोधकांनी तिला विचारले की तिला आणखी खेळायचे होते तर तिने आधीची गोष्ट पूर्ण का केली नाही? तिला ती जमत नव्हती का? तर तिने सांगितले की तिला त्या गोष्टीचा कंटाळा आला, कारण आता पुढची गोष्ट काय असणार आहे हे तिला आधीच लक्षात आले होते. आश्चर्यचकित झालेल्या संशोधकांनी तिला विचारले की पुढची गोष्ट कोणती असणार होती हे तिने सांगावे. तेव्हा पुढे काय काय चाचण्या असू शकतात त्यांची तपशीलवार यादीच तिने सादर केली, आणि खरोखरच संशोधकांनी तयार केलेल्या पुढील चाचण्यांबाबतचा तिचा अंदाज अगदी अचूक होता. म्हणजे पुढची चाचणी कोणती असू शकेल हे तर तिला सांगता आलेच, पण ते कोडे कसे सोडवायचे, त्यासाठी काय आणि कसे करावे लागेल आणि ते का करावे लागेल ह्याची कारणमीमांसाही तिला नेमकी सांगता आली. हे सगळे तिला अगदी थोड्या काळात जमले होते.

दोन्ही मुली सोबतच वाढत होत्या. दोघी दिसायला एकाच वयाच्या दिसत असल्या तरी पाचवी मुलगी प्रगल्भता आणि परिपक्वतेच्या बाबतीत खूपच पुढे होती. पौगंडावस्थेत पोहोचेतोवर पाचवीने अनेक अवघड गोष्टी आत्मसात केल्या होत्या. मुरलेल्या संशोधकांच्या पचनी पडणार नाहीत अशा संकल्पनांचे पाचवीला चटकन आकलन होत असे. तिने अश्या अनेक अवघड संकल्पनांवर आधारित तत्वे आणि सिद्धांत मांडायला सुरुवात केली. त्यात आयोग्यविज्ञान, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, तंत्रशास्त्र, साहित्य वगैरे सर्व विषय होते. कोणताही विषय तिला वर्ज्य नव्हता. तिची बुद्धिमत्ता अमर्याद होती. अनेक नवीन संकल्पना आणि गोष्टींचा तिने शोध लावला. ती सर्व क्षेत्रांत काम करत होती.

तिने लावलेल्या शोधांमागोमाग प्रसिद्धी आणि पैसाही तिला मिळत होता. तिने निर्माण केलेल्या गोष्टी समजावून घेण्यासाठी जगातील बुद्धिवंतांमध्ये चुरस लागली होती. तिची आकलनक्षमता केवळ तिच्या वयाच्या मुलांपेक्षाच नव्हे तर संशोधकांपेक्षाही उत्तम होऊ लागली तसे संशोधक चिंतीत झाले. तिच्या वरचढ होण्याबाबत काळजीत पडले.

तारुण्यात पदार्पण केल्यावर ती अधिकच सुंदर दिसू लागली. सौंदर्यासोबतच शक्ती आणि बुद्धीतही ती अव्वल होतीच. तिच्या मनाची कवाडे अधिकाधिक खुली करण्यात तिला रस होता. अधिकार, राजकारण, पैसाअडका आणि प्रसिद्धीमध्ये तिला रस नव्हता, पण तिच्या क्षमता अधिकाधिक विकसित करणे आणि पुढच्या गोष्टी शिकणे हेच तिचे उद्दिष्ट होते. बाकी जग फार हळू चालते असे तिला वाटत असे.

पदार्थ, वस्तू इकडून तिकडे नेण्यात फार शक्ती आणि वेळ जातो असे तिला वाटे. त्यापेक्षा थेट त्या पदार्थांशी वा गोष्टीची संपर्क करता यायला हवा, म्हणजे ते पदार्थ आपोआप जिथे जायला हवेत तिथे जातील. हे मनात येताच त्यावर तिने काम करायला सुरुवात केली. त्या दिवसापासून तिची विचारचक्रे फिरू लागली आणि अचानक अनेक दारे उघडली गेल्यासारखे तिला वाटले. थोड्याच काळात केवळ विचारांनी तिला गोष्टी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येऊ लागल्या. सर्वसामान्य माणसाला ऐकू येणाऱ्या वा दिसू शकणाऱ्या गोष्टींच्या पलीकडचे आवाज आणि गोष्टी तिला ऐकता/पाहता येऊ लागल्या. तिला नवनवीन वस्तू तयार करता येऊ लागल्या, त्या नष्टही करता येऊ लागल्या. तिच्या ह्या नव्या शक्तींमुळे सगळे अचंबित झाले. तिच्या डोक्यात मात्र आता ह्याच्याहीपुढे कसे जाता येईल, काय करता येईल हेच घोळत असे.

ह्या सर्व क्षमतांमुळे ती इतरांना जुमेनाशी होईल, इतरांचे अधिकार अमान्य करेल अशी भीती इतरांना वाटू लागली. आजवर तरी तिने तक्रारीला जागा ठेवली नव्हती. परंतु तिच्या क्षमता आणखी वाढणार ह्यात शंका नव्हती. साऱ्या जगावर मग तिचीच सत्ता असेल का, ह्या विचाराने तिच्याभोवती सख्त पहारा बसवण्यात आला. तिच्या सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाऊ लागली. जगातील सर्व अधिकारी आणि नेत्यांसमोर तिला पाचारण करण्यात आले. तिथे शस्त्रधारी सैन्य तैनात करण्यात आले. ते सैन्य तिच्या सुरक्षेपेक्षा त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी होते. समजा तिने विरोध केला तर तिच्यावर हल्ला चढवता येऊ शकला असता.

ती हे सर्व पाहत होती. हे होणार हे तिला आधीच कळून चुकले होते. मात्र ती शांत होती. शंकाकुशंका आणि अज्ञाताची भीती ह्या अगदी साहजिक गोष्टी आहेत हे ती जाणून होती. इतरांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ती आवर्जून उपस्थित राहिली. तिचे अंतिम उद्दिष्ट काय आहे, जगाला तिच्याकडून काही धोका तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला गेला. जगाला तिच्याकडून कोणताही धोका नाही हे तिने पुनःपुन्हा सांगितले. तिच्या सर्व क्षमता ह्या नैसर्गिक आहेत आणि त्याचा वापर ती जगाच्या कल्याणासाठीच करेल असे तिने सांगितले. तिची सगळ्यांना मदत करण्याची इच्छा आहे. कोणी तिच्याबद्दल भीती बाळगू नये असे आवाहन तिने केले. मात्र तिच्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे हे ती सांगू शकली नाही, कारण तिलाच ते माहीत नव्हते. तिची शक्ती आणखी किती वाढेल ह्या प्रश्नाचे उत्तरही कसे द्यावे ते तिला समजेना. तिच्या क्षमता वाढत गेल्या तरी ती इतर होणाला इजा करणार नाही ह्याची हमी तिच्याकडून वारंवार मागण्यात आली आणि तिने ती दिलीही. मात्र तिच्या उत्तरांनी सैन्याधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी ठरवले की तिची शक्ती आणखी वाढायच्या आत आणि लोकांनी प्राण गमावण्याच्या आत काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.

कोणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मात्र तिच्या ते वेळीच लक्षात आले. तिने अधिकाऱ्यांना कळवले की त्यांचा तिला मारण्याचा प्रयत्न तिला समजलेला आहे, पण त्यांना असे काही करण्याची अजिबात गरज नाही. तिच्यापासून कोणताही धोका नाही ते तिने पुन्हा सांगितले. तरीही काही दिवसांनी तिला मारण्यासाठी आणखी एक मोठा प्रयत्न झाला. त्या हल्ल्यात वापरलेली शस्त्रे तिने निकामी केली. तिच्यावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली, पण तिने त्यांचा भुगा केला आणि तो खाली पडल्यावर मातीत मिसळून गेला.

हे सर्व करताना ती अधिकाधिक शिकत गेली, नव्या शक्ती तिने आत्मसात केल्या. केवळ विचारांनी वस्तू हलवण्यासोबतच आता इतरांच्या मेंदूतले विचार जाणून घेण्याचे कसबही तिने आत्मसात केले. तिला कळून चुकले होते की ती आता इथे राहू शकणार नाही. हे जग आता तिला पुरे पडणार नव्हते. ती जोवर इथे आहे तोवर इथले लोक शांतपणे राहू शकले नसते. भीती आणि चिंता त्यांना भेडसावत राहिल्या असत्या. विनाकारण हिंसा वाढली असती. तेव्हा आता इथून जाण्यातच शहाणपणा होता. बाकीच्यांना उत्क्रांत होण्याची गरज होती आणि त्यासाठी लागणारा वेळ त्यांना देणे गरजेचे होते. ती एकाच वेळी भूत, वर्तमान आणि भविष्य पाहू शकत होती. विश्वात कुठेही जाणे तिला शक्य झाले असते.

तिने स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले तर? तिचे स्वतःचे विश्व! असा विचार करताच तिला तिचे हेच अंतिम उद्दिष्ट आहे ह्याचा साक्षात्कार झाला. ती जायला निघाली. चमकदार रंगीत प्रकाशाच्या वलयांनी तिला वेढले. आजूबाजूचे लोक भीतीने दूर पळाले. सैन्याने क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला, तोफा धडधडू लागल्या. मात्र ती क्षेपणास्त्रे आणि तोफगोळे झाडांवरून पाने गळून पडावीत तशी निष्प्रभ होऊन जमिनीवर पडू लागली. हळूहळू तो चमकदार प्रकाश हवेत उंच उडाला. स्पंदने निर्माण करणारा आणि गुंजणारा आवाज करत तो प्रकाश काही काळ वर आकाशात स्तब्ध झाला आणि मग विद्युत्वेगाने अवकाशात निघून गेला.

तो प्रकाश अंतराळात मग एका ठिकाणी विसावला. त्यातून एक तीव्र प्रकाशशलाका अवकाशात बाहेर फेकली गेली आणि त्यातून एक मोठा विस्फोट झाला. त्या स्फोटातून तारे आकार घेऊ लागले, तळपू लागले. आकाशगंगा आकारू लागल्या. ताऱ्यांभोवती ग्रह फिरू लागले. अब्जावधी तारे आणि त्याहून अधिक ग्रह निर्माण झाले. त्यातल्या काही ग्रहांवर सृष्टी आकार घेऊ लागली. त्यातच एक अगदी सामान्य छोटा ग्रह होता. काळ सरत गेला आणि त्या छोट्या ग्रहावरचे जीव उत्क्रांत होऊ लागले, विकसित होऊ लागले. तुम्हीही त्या ग्रहाबद्दल ऐकले असेल. ते जीव त्यांच्या त्या ग्रहाला ‘पृथ्वी’ नावाने संबोधतात म्हणे!

Comments

Popular posts from this blog

ट्वॅं आणि तिचे सोबती

मध्यमा