सर्व्हिसिंग

वरदा वैद्य

मूळ तेलगू कथालेखक- डॉ. रवि कोप्परपु

‘गैरेज’ ह्या शीर्षकाखाली मूळ तेलुगू कथा मेरीलँड तेलुगू असोसिएशनच्या (TAM) ‘पत्रिके’मध्ये २०१९ मध्ये प्रकाशित झाली होती.

“अरे कार सुरू केली की तो कार मेन्टेनन्सचा दिवा ऑन दिसायला लागलाय. सर्व्हिसिंग करून आणशील का प्लीज? पुढच्या आठवड्यात रमेश आणि त्याच्या बायकोला न्यू जर्सीला आणायला जायचंय त्याच्या आत सर्व्हिसिंग करायला लागेल.” माझी बायको म्हणाली.

खरं आहे. गाडी दुसऱ्या राज्यात न्यायची तर आधी तिचं सर्व्हिसिंग करायलाच हवं. काही दुरुस्तीची आवश्यकता आहे का, की नेहमीचं, दर सहा महिन्यांनी करण्याचं सर्व्हिसिंग पुरेसं आहे, हे बघायला हवं. फिल्टर्स, ऑइल बदलायला झालंय का ते बघायला हवं. गेल्या दीड वर्षात काही ना काही कारणांनी, म्हणजे थोडक्यात माझ्या आळशीपणामुळे, गाडीकडे बघायला मला वेळच झाला नव्हता. गाडीचं मायलेज कमी झालं आहे, गाडी जरा खडखडत चालत्ये, इंजिनातूनही कसलासा आवाज येतोय, तेव्हा गाडी सर्विसिंगला न्यायलाच हवी आहे ह्याची मला जाणीव झाली.

नेली.
मेकॅनिक म्हणाला की बघून सांगतो, किमान तासभर तरी लागेल. मग तिथेच ताटकळत बसण्याऐवजी मी जवळच्या शॉपिंग मॉलमध्ये जायचं ठरवलं. परत आलो तोवर गाडीचं निदान झालेलं होतं. माझ्या हातांत कारची किल्ली ठेवताठेवता तो मेकॅनिक म्हणाला, “गाडीचं सर्व्हिसिंग केल्याला खूप दिवस झाले असतील ना मालक?” “हो बहुतेक,” मी पुटपुटलो.

“ऑइल अगदी काळं पडलं आहे. फिल्टर्समध्ये खूप कचरा अडकला आहे. वॉशर फ्लुइड तर जवळपास संपलंच आहे. चाकाजवळचं बॉल बेअरिंग पार घासलं गेलंय आणि ऑइल सगळीकडे नीट पोहोचत नाहीये. आधी का नाही आणली गाडी तुम्ही? ते बॉल बेअरिंग बदलावं लागेल. नाहीतर अपघात होणार बघा! ते बदलण्याचे वेगळे पैसे लागतील. सर्व्हिसिंग वेगळे. तुम्ही वेळोवारी तेलपाणी केलं असतं गाडीला तर कमी पैश्यात काम झालं असतं.”

हं… मी डोकं खाजवलं. हा प्राणी बिल किती होईल सांगण्याआधी नमनाला धडाभर बोलतोय तर!

“किती होतील?” मी जरा बिचकतच विचारलं.

“एकूण बाराशे डॉलर्स होतील. तुम्ही दुसरीकडे नेलीत गाडी तरी तिथेही एवढं बिल होईलच. कदाचित जास्तच. वेळोवारी तेलपाणी करायला हवं मालक. छोट्याछोट्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष केलं की मोठा प्रॉब्लेम होतो. आणि मग अवघड होऊन बसतं सगळं. पण ठीक आहे. अजून वेळ गेलेली नाही. नियमितपणे सर्व्हिसिंग करून घेत जा आणि मग गाडी कशी छान पळत राहते की नाही बघा!”

त्याचं म्हणणं खरंच होता. ते अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. मी होकारार्थी मान डोलावली आणि कारची किल्ली पुन्हा त्याच्याकडे सुपूर्त केली. ******

आठवड्याभरानंतर मी रमेश आणि त्याची बायको अरुणाला आणायला न्यूजर्सीला गेलो. ते भारतात राहतात. ते दोघं त्यांच्या कोणा नातेवाईकांकडे न्यू जर्सीला आल्याचं समजलं, म्हणून मग मी त्यांना आमच्याकडेही येण्याचं निमंत्रण दिलं. रमेश माझ्याहून तीनेक वर्षांनी मोठा असेल. लहानपणी आम्ही शेजारी राहात होतो. आमची कौटुंबिक ओळख होती. त्याचं अरुणाशी लग्न झालं तोवर मी अमेरिकेत आलेलो होतो. त्याची मुलं आता मोठी झाली आहेत, बहुतेक कॉलेजात असावीत, तीही शेवटच्या वर्षाला वगैरे. मला नेमकं माहीत नाही.

घरी पोहोचल्यावर त्या दोघांची आणि माझ्या बायकोची परस्पर ओळख, नमस्कार-चमत्कार झाल्यावर माझी बायको स्वयंपाकाचं बघायला आत गेली. ‘मी काही मदत करू का’ म्हणत अरुणाही मागोमाग उठली, तसा रमेशने “तू कुठे चाललीस?” म्हणत तिचा हात धरला. तिने आत जाऊ नये असे त्याला सुचवायचं होतं का? थोडी ओशाळल्यासारखी होत ती म्हणाली, “तुम्ही दोघं बसा ना बोलत! मी तिला मदत करते, म्हणजे कामं पटापट उरकतील. त्यांच्या मुलांनाही भुका लागल्या असतील ना!” आणि आत निघून गेली.

मी डोळा मारत रमेशला म्हटलं, “काय बायकोशिवाय अजिबात करमत नाही वाटतं?”
रमेश हसला आणि म्हणाला, “घरची सवय आहे माझी.” त्याच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तो काहीतरी लपवण्याचा, चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटलं. कदाचित तसं नसेलही. आतून अरुणा आणि माझ्या बायकोच्या बोलण्याचे आवाज येत होते. त्यांचं एकमेकींशी चांगलं जुळलंय तर असं माझ्या मनात आलं. जेवणं झाली, मुलं झोपायला गेली तशी आम्ही चौघं गप्पा मारायला बसलो. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे उठायची घाई नव्हती.

अरुणा आणि रमेशचं एकमेकांशी फारच गुळपीठ आहे असं मला जाणवलं. एकमेकांशी आदराने बोलणं, एकमेकांना हवं-नको बघणं असं त्यांचं चालू होतं. वरवर तरी त्यांचं वागणं सहज असल्याचं ते दाखवत असले तरी ते दोघंही काहीतरी दुखरं लपवायला बघताहेत असं मला वाटत राहिलं.
रात्रीचा एक वाजून गेला तशी आम्ही झोपायला उठलो. दुसऱ्या दिवशी डीसीला जाण्याचा बेत ठरला होता. अरुणा-रमेशच्या वागण्याबाबतचं माझं निरीक्षण, माझं वाटणं मी बायकोला बोलून दाखवलं तेव्हा तिलाही ते जाणवल्याचं ती म्हणाली. पण ‘आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या माणसांबद्दल पहिल्या भेटीत काही ग्रह करून घेण्यात अर्थ नाही’ असं तिचं मत होतं. मी मात्र त्यांच्याबद्दल विचार करत करतच झोपलो.
दुसऱ्या दिवशी लवकर मेट्रोने आम्ही डीसीला गेलो. नेहमीच्या स्थळांना - संग्रहालयं, पुतळे, स्मारकं वगैरे - भेटी दिल्या. डीसी एका दिवसांत बघणं तसं अशक्यच असत. दुपारी जेवायची वेळ टळून जाईपर्यंत आम्ही चालून दमलो होतो. वॉशिंग्टन स्मारकाच्या आवारात आम्ही जमिनीवरच बसून घेतलं. रमेशला आणि मला खाद्यपदार्थांचा एक ठेला दिसला आणि आम्ही दोघं सगळ्यांसाठी खाणं आणायला गेलो. शनिवार असल्यामुळे अर्थातच मोठी रांग होती. आम्हीही रांगेत उभे राहिलो. आता माझ्या मनात वळवळणाऱ्या किड्याबद्दल रमेशला विचारण्याची ही एक चांगली संधी मला मिळाली होती.
“तुला एक विचारू का? म्हणजे बघ हं, उत्तर द्यायलाच हवं असं नाही, तुला त्रास होणार असेल तर,” मी म्हणालो.
“विचार की!” रमेश म्हणाला.
“म्हणजे, मी कालपासून बघतोय की तुमचं, तुझं आणि अरुणाचं, एकमेकांशी छान जमतंय. अगदी नुकतंच लग्न झालं असावं असं. म्हणजे चांगलंच आहे, पण तरी तुम्ही दोघं काहीतरी लपवताय असं वाटलं. काहीतरी खुपतंय असं वाटलं. म्हणजे तसं नसेल तर चांगलंच आहे. आपण बालमित्र आहोत म्हणून आपलं तुला स्पष्टच विचारलं. पण तुला ह्याबद्दल बोलायला नको वाटत असेल तर तसं सांग बरं का. मी आपलं कुतूहल वाटलं म्हणून विचारलं. सगळं ठीक चाललंय ना?” मी म्हणालो.

थोड्या अंतरावर जमिनीवर बसलेल्या अरुणाकडे बघत रमेशने एक सुस्कारा सोडला आणि म्हणाला, “मला वाटलं होतं की तुला जाणवेल, पण इतकं लगेच लक्षात येईल असं वाटलं नव्हतं.”
“नाही, तसं लगेच लक्षात येत होतं असं नाही, पण असं वाटलं खरं.”
मी नको होतं का विचारायला? चोंबडेपणा तर होत नाहीये ना माझ्याकडून? मी त्याच्या दुखऱ्या नसेवरच नेमकं बोट ठेवलं की काय?
“आता आम्ही दोघंही ठीक आहोत,” रमेश म्हणाला.
“आता? म्हणजे?”
त्याची नजर अजूनही अरुणावरून हटली नव्हती. तो सांगू लागला -
“आमच्या लग्नाला आता वीस वर्षं झाली आहेत. तुला माहीतच आहे. सुरुवातीला सगळं ठीक, सुरळीत चालू होतं. अगदी आताआतापर्यंत तसं बरं चाललं होतं, म्हणजे अगदी दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत. तशी नवराबायकोमध्ये अधूनमधून होणारी भांडण आमच्यातही होत होती, पण अगदी मोठा प्रॉब्लेम म्हणावा असं काही नव्हतं.” “पण गेल्या दोन वर्षांत आम्हा दोघांत वारंवार खटके उडायला लागले. अगदी क्षुल्लक गोष्टींवरूनही भांडणं व्हायला लागली आणि दोघंही आडमुठेपणा करत राहिलो. आम्हाला भांडायला अगदी बारकं कारणही पुरायला लागलं. मुलांनी काय करायला हवं, काय नको, कोण कोणतं काम करतं किंवा करत नाही, असं काहीही. आमचं नातं अगदी थंड, गढूळ आणि खवट होऊन गेलं.”

“इतरांशी आम्ही नीट वागत होतो, एकमेकांशी मात्र दुश्मनी असल्यासारखं! मग मला असं वाटायला लागलं की हे काय चाललंय? केवळ ओळख असलेल्यांशी आपण छान हसून वागतो-बोलतो, आणि जिच्यासोबत २० वर्षं काढली तिला असं वाईट का वागवतो? मला तिच्यातले आणि तिला माझ्यातले दोषच कसे काय सतत दिसत राहतात? आमचं नातं अगदी दुरुस्त होण्यापलीकडे चाललं होतं की काय?”

“सहा महिन्यांपूर्वी आमचं खूपच मोठं भांडण झालं. म्हणजे आता बास, आता एकमेकांसोबत राहणं अशक्य आहे असं वाटायला लागलं. मुलंही तोवर कॉलेजात जायला लागली होती. वाटलं की आता वेगळं व्हावं हेच खरं. म्हणजे अगदी घटस्फोट नाही, पण निदान एकमेकांपासून काही दिवसांचा ब्रेक घ्यावा.”
“पण नेमकी तेव्हाच एक महत्त्वाची गोष्ट घडली. म्हणजे घटना तशी साधीच होती, पण त्यामुळे आमचा दृष्टिकोन मात्र बदलला.”
“काय घडलं नेमकं?” मी रमेशच्या बोलण्यात चांगलाच गुंतलो होतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आपण नाक खुपसतोय ह्याचं भान मला राहिलं नाही.
“माझी कार सर्व्हिसिंग करायला झाली होती. मी जेव्हा ती गॅरेजमध्ये घेऊन गेलो तेव्हा तिथला मेकॅनिक म्हणाला की मी गाडीकडे फार दुर्लक्ष करतोय. गाडीत बरेच आणि मोठे बिघाड होते. गाडी नीट दुरुस्त करायला बराच वेळ लागणार होता. त्यानंतरही मी गाडीची काळजी नियमितपणे घेतली नाही तर मग ती दुरुस्तीपलीकडे जाईल असंही म्हणाला.”
“मी नुसतंच ऐकून घेतलं. पण नंतर कार दुरुस्त होण्याची वाट पाहात थांबलो तेव्हा मात्र त्या मेकॅनिकचे शब्द माझ्या कानांत घुमत राहिले. नकळत मी कारची आणि माझ्या-अरुणाच्या नात्याची तुलना करायला लागलो. आम्ही दोघं एकमेकांच्या बाबतीत निष्काळजी झालो आहोत का? हे असंच चालू राहिलं तरीही नातं तुटणार नाही अश्या भ्रमात होतो का आम्ही? पण आता तसच झालं ना? त्या ताणाखाली, निष्काळजीपणापायी आमचं नातं पार कोमेजून गेलं आणि आता ते कधीही कोलमडून पडेल.”
“आता ते दुरुस्त करायचं तर काय करावं लागेल? एक तर बारक्या दुरुस्त्या कराव्या लागतील - म्हणजे बारीकसारीक गोष्टींवरून होणारी भांडणं टाळावी लागतील. कारला जशी सर्व्हिसिंग करतो तसं नात्यालाही सर्व्हिसिंग करावं लागेल. म्हणजे दुर्लक्ष आणि वैताग जसा लगेच दाखवतो तशी एकमेकांबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेमही दाखवता यायला हवं. आणि हे दोघांनीं करायला हवं, केवळ एकाने करून भागणार नाही.”
रमेशचं बोलणं ऐकून मला माझ्या कार मेकॅनिकच्या बोलण्याची आठवण झाली.
“मग? मग काय केलंस तू?” मी माझं कुतूहल लपवू शकलो नाही. चोंबडेपणाच्या सगळ्या मर्यादा मी आता ओलांडल्या होत्या आणि त्याची मला फिकीरही नव्हती.
“हाच तो आमच्या गोष्टीतला ‘टर्निंग पॉईंट’! दुरुस्त झालेली कार घेऊन घरी येताना मी मधे एका दुकानात थांबून अरुणासाठी एक छोटी भेटवस्तू घेतली. ती पाहून अरुणाला आश्चर्य वाटलं, पण मग आम्ही बसून एकमेकांशी नीट बोललो. मी म्हणालो की आपली गाडी रुळावरून घसरली आहे ती पुन्हा रुळावर आणू या. मी माझं मन तिच्याकडे मोकळं केलं आणि तिनेही तिला काय वाटतंय ते सांगितलं. तिथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो, कारण आम्ही दोघंही नात्याची गाडी रुळावर आणायला तयार होतो.”
“गेल्या सहा महिन्यांत आमच्या दोघांच्या वागण्यात, नात्यात बराच आणि तोही चांगला फरक पडला आहे. आम्ही आता एकमेकांसाठी आवर्जून काही गोष्टी करतो. म्हणजे आता आम्ही अजिबात भांडत नाही असं अर्थात नाही, पण आता एकमेकांचे बारके दोष आम्ही सोडून द्यायला लागलो आहोत.”
रमेशचं बोलणं ऐकताना माझ्या मनात खळबळ माजली होती.

“आणखी एक गोष्ट आहे. महत्त्वाची. पण आपण त्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो, “ रमेश म्हणाला.
“कोणती गोष्ट?”
“हे बघ, आपलं आयुष्य काही ७०-८० वर्षांपेक्षा जास्त असणार नाहीये, आपण कधी गचकू कोणाला सांगता येणार नाही. त्यामुळे आता जी काही थोडी-फार वर्षं बाकी आहेत ती भांडाभांडी करण्यात आणि ताणतणावात जगण्यात काय अर्थ आहे? हाच विचार करून मग आम्ही जोडीनं अमेरिकावारी करायचं ठरवलं. नव्याने बहरलेल्या नात्यासाठी थोडा स्थानबदल! आपण कारमध्ये नवं ऑइल घालतो तसं,” तो हसत म्हणाला.

ठेलावाल्याने आमच्या खाण्याचे पुडे आमच्या हातांत ठेवले. आम्ही सगळ्यांनी बसून खाल्लं. आणखी कुठे फिरण्याचं त्राण कोणातच उरलं नव्हतं. संध्याकाळपर्यंत आम्ही घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपासची एक-दोन ठिकाणं दाखवायला आम्ही त्या दोघांना नेलं आणि मग संध्याकाळी त्यांना मी पुन्हा न्यूजर्सीला सोडून आलो. परत येईस्तोवर रात्र झाली होती. येतानाही रमेशचं बोलणं माझ्या मनात घुमत राहिलं होतं.

घरी पोहोचेतोवर झोपायची वेळ झाली होती. मी घरी पोहोचलो तेव्हा बायको पुस्तक वाचत पडली होती.
“आपणही ऑइल बदललं ना, तर आपले पार्टही चांगले राहतील.” मी म्हणालो.
बायकोला काहीही अर्थबोध झाला नाही. “कशाबद्दल बोलतोयस तू? मला काहीही समजलं नाही!” ती म्हणाली.
काहीही संदर्भ ना देता मी बोलत सुटलो हे माझ्या लक्षात आल्यावर मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
“अगं, म्हणजे आपण कार मेंटेन करतो तसं आपलं नातंही आपल्याला मेंटेन करायला हवं ना! म्हणून तर ही बघ मी तुझ्यासाठी फुलं घेऊन आलो आहे.” येता येता अंगणातली काही फुलं मी वेचली होती ती मी तिच्यासमोर धरली. “ही फुलं म्हणजे ऑइल आणि आपण म्हणजे कार.”
बायकोने पुस्तक मिटलं आणि ती उठून बसली. माझ्याकडे रोखून पाहात माझ्या हातातली फुलं घेऊन त्यांचा वास घेत म्हणाली, “हं.. हे तुझं ऑइल आणि फिनाईल वगैरे समजतंय मला. म्हणजे आहे, तू सुधारशील अशी आशा करणं शक्य आहे!” मग फुलांकडे पाहात म्हणाली, “ऑइल तर चांगलं आणलं आहेस.”
मी पलंगावर बसलो आणि तिच्या हाताच्या दिशेने माझा हात सरकवत नेला. पण माझ्या हातावर हलका फटका मारत ती म्हणाली, “उद्या सकाळी ऑफिस आहे, तेव्हा आता मुकाट्याने झोप. नाहीतर तुझंही सर्व्हिसिंग करावं लागेल.”

Comments

  1. सुंदर कथा. असं सर्व्हिसिंग व्हायलाच हवं. रवीच्या विज्ञानकथा उत्तम असतात. ही विज्ञानकथा नाही, तरी सुरेख हाताळली आहे. भाषांतर छान झालंय, मूळ कथा मराठीत लिहिली आहे असं वाटण्याइतपत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

सूर्य जवाहिऱ्या